तंत्रज्ञानाची दुसरी बाजू
एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात..!
आतापर्यंत आपण तंत्रज्ञानाची संकल्पना आणि तंत्रज्ञानाचा ऐतिहासिक प्रवास याबद्दल माहिती घेतली ; परंतु तंत्रज्ञानाविषयी जाणून घेत असताना तंत्रज्ञानाची दुसरी बाजू देखील जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. तंत्रज्ञानाविषयी साक्षर होत जाण्याच्या आपल्या प्रवासामध्ये हा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे.
आता या प्रश्नाचे उत्तर आपण तंत्रज्ञानाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यावर अवलंबून आहे. बंदूक हा तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. या शस्त्राचा आपल्या तसेच दुसऱ्यांच्या संरक्षणासाठी उपयोग करता येतो ; त्याचप्रमाणे आपल्या आणि दुसऱ्यांच्या हत्येसाठीदेखील उपयोग करता येतो. आता हा उपयोग संरक्षणासाठी करायचा की हत्येसाठी करायचा हे बंदूक आपल्याला सांगू शकत नाही. त्यासाठी आपला स्वतःचा सदसद्विवेक जागृत असणे अत्यंत गरजेचे आहे. असा सदसद्विवेक प्रत्येकालाच करता येईल असे नाही. त्याचप्रमाणे तो प्रत्येक परिस्थितीत देखील करता येईल हेही सांगता येत नाही. यातूनच अनेक जटिल समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणूनच तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण अत्यंत जागृत राहिले पाहिजे.
एखाद्या तंत्रज्ञानाची निर्मिती ही नेमक्या कोणत्या गरजेतून, कोणत्या कारणासाठी केली जाते यावर देखील त्या तंत्रज्ञानाची उपयुक्तता आणि त्याचा चांगले-वाईटपणा अवलंबून असतो. चांगले-वाईटपणा ही मुळातच एक सापेक्ष संकल्पना आहे आणि त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये एखादे तंत्रज्ञान निर्माण करण्यात आले त्यावर देखील त्याचा चांगले-वाईटपणा अवलंबून असतो. तंत्रज्ञानाच्या निर्मितीची माध्यमे देखील अनेक असतात. त्यांपैकी काहींची माहिती आता घेऊ.
मानवतेच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायचा या दृष्टिकोनातून जर तंत्रज्ञान निर्माण केले जात असेल आणि त्यामध्ये गुंतवणूक केली जात असेल तर अशी तंत्रज्ञानाची निर्मिती कल्याणकारी दृष्टिकोनातून होत असते. अशा प्रकारे निर्माण झालेल्या तंत्रज्ञानातून मानवतेचे जास्तीत जास्त कल्याण कसे साधता येईल याचाच विचार केला जातो. जर मानवाचे कल्याण व्हायचे असेल तर त्याच्या आजूबाजूच्या पर्यावरणाचे त्याचप्रमाणे समाजाचे एकत्रित कल्याण होणे अत्यंत आवश्यक असते, आणि त्यामुळे सार्वत्रिक कल्याणाच्या भावनेतून तंत्रज्ञानाची निर्मिती होत असते. अशा प्रकारे निर्माण झालेले तंत्रज्ञान हे जास्तीत जास्त उपयुक्त आणि शाश्वत ठरते. उच्च भावनेतून तंत्रज्ञानाचा अभ्यास करणारे लोक आणि संस्था तंत्रज्ञानावर कल्याणकारी दृष्टिकोनातून संशोधन करतात. या संशोधनाचा उद्देश पैसे अगर नफा मिळवणे हा नसून केवळ कल्याण हाच असतो.
व्यावसायिक दृष्टीने नफा मिळवण्याच्या तत्त्वावरती जर तंत्रज्ञानाची निर्मिती आणि विकास केला जात असेल तर ती निर्मिती व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जात आहे असे आपण म्हणू शकतो. कोणत्याही व्यवसायाचा पायाच मुळी नफा आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा विकास केला जात असताना प्रत्येक पैलुतून केवळ जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल, याचाच विचार केला जातो. या दृष्टिकोनात कल्याण किंवा पर्यावरणाचे रक्षण ही उदात्त भावना न्यून प्रमाणात असून नफा हीच भावना प्राधान्याने असते. तंत्रज्ञानाच्या वापरकर्त्याला जर त्या तंत्रज्ञानाच्या वापरातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असेल तरच तो समाधानी होईल आणि त्याच्या योगाने उत्पादनकर्त्याला देखील जास्तीत जास्त नफा होईल. या दृष्टिकोनात प्रामुख्याने तत्कालीन फायद्याचा विचार केला जातो आणि दीर्घकालीन कल्याणाचा, शाश्वत विकासाचा विचार केला जात नाही. हा दृष्टिकोन व्यावसायिक पातळीवर जरी अनुकूल असला तरी तो मानवतेच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून हानिकारक आहे.
एखाद्या विशिष्ट परिस्थितीत उद्भवलेल्या समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी जर तंत्रज्ञानावर संशोधन केले जात असेल तर असे तंत्रज्ञान परिस्थितीसापेक्ष गरजेतून निर्माण केले असे आपण म्हणू शकतो. बहुतांशी अशा प्रकारची निर्मिती आपत्कालीन परिस्थितीमध्ये केली जाते आणि त्यामध्ये शाश्वत विकास, कल्याणकारी दृष्टिकोन किंवा व्यवसाय हे उद्दिष्ट ठेवून चालत नाही. तंत्रज्ञानाची दीर्घकालीन उपयुक्तता किती आहे याचा देखील विचार करणे अशा परिस्थितीत शक्य नसते. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेऊन तंत्रज्ञानावर संशोधन करून तंत्रज्ञानाची निर्मिती करावी लागते. अशा प्रकारच्या निर्मितीमध्ये तंत्रज्ञानाच्या मूलभूत उद्दिष्टावर आणि सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण होतात.
हौसेला मोल नसते हे आपण सर्वांनी ऐकलेलेच आहे. हौस आणि महत्त्वाकांक्षा भागवण्यासाठी देखील तंत्रज्ञानाची निर्मिती केली जात असते. उदा., गाड्यांच्या शर्यती. या शर्यतींचे अनेक चाहते असतात आणि यामध्ये अनेक लोक देखील हौसेने सहभागी होतात. असे लोक या गाड्यांवर सातत्याने संशोधन करतात. अनेक व्यावसायिक उत्पादनकर्ते देखील अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात. या दृष्टिकोनामध्ये तंत्रज्ञानाची निर्मिती ही हाऊस भागवण्यासाठी किंवा आनंद घेण्यासाठी म्हणून केली जाते. स्पर्धात्मक आणि थरारक भावना हा या निर्मितीचा पाया असतो. यामध्ये अनेकदा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अनुकूल अशा तंत्रज्ञानाची निर्मिती होते परंतु ते तंत्रज्ञान एक तर महागडे असते किंवा वापरण्यास अत्यंत अवघड असल्याकारणाने सामान्य लोकांमध्ये येत नाही. असे तंत्रज्ञान वापरणारा एक वेगळा वर्ग असतो. येथे देखील शाश्वत विकास आणि सार्वत्रिक कल्याण हा भाग न्यूनतम असतो.
वरील विवेचनावरून आपल्याला हे दिसून येते की तंत्रज्ञानाची निर्मिती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कारणांमधून होते आणि त्यामुळे त्याची नेमकी उपयुक्तता आणि चांगले-वाईटपणा यांचा तर्क करणे क्लिष्ट असते. त्यामुळे सर्व परिस्थितीसापेक्ष घटकांचा विचार करून अधिकाधिक समतोल साधून तंत्रज्ञानाची निर्मिती करावी लागते.
तंत्रज्ञानाच्या चुकीच्या तसेच अतिवापरातून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अशा समस्या बऱ्याचदा सोडवण्यास अत्यंत कठीण असतात. तंत्रज्ञान जितक्या उच्च पातळीचे आहे तितक्याच त्याच्यापासून निर्माण झालेल्या समस्या देखील उच्च पातळीच्या असतात. या समस्या निर्माण का होतात आणि त्या कशा सोडवायच्या हे देखील थोडक्यात पाहू.
सर्व परिस्थितीसापेक्ष मुद्द्यांचा विचार न करता केवळ एकाच विशिष्ट दृष्टिकोनातून जर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला तर त्यातून अनेक समस्या उद्भवतात आणि सोडवण्यास कठीण होऊन बसतात. जर अशा प्रकारचा वापर वेळेत थांबवला नाही तर त्याचे खूप भयानक परिणाम होऊ शकतात. असे परिणाम कसे असतात याची अनेक उदाहरणे आपण आपल्या रोजच्या जीवनात, आजूबाजूला पाहतच असतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल येथे विशेषत्वाने सांगणे आवश्यक नाही. परंतु एकांगी दृष्टिकोन हा मानवतेच्या कल्याणामध्ये बाधा आणणारा आणि मानवाला अविचारी आणि हिंसक कृती करण्यासाठी भाग पाडणारा ठरतो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बाबतीत एकांगी दृष्टिकोन आणि तीव्र भावना या टाळायलाच हव्यात.
तंत्रज्ञानाचा व्यवसाय करणे हा गुन्हा नाही परंतु असा व्यवसाय करत असताना तो जास्तीत जास्त विवेकाने आणि शाश्वत पद्धतीने होणे देखील अत्यंत गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या व्यवसायात नफा अधिक आहे आणि तंत्रज्ञान माणसाच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये गुंफलेले असल्यामुळे सामान्य माणसापर्यंत व्यवसाय पोहोचवून अधिकाधिक पैसा मिळवणे शक्य आहे. परंतु हा पैसा मिळवत असताना सामान्य माणसाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याचा विचार व्यावसायिकांनी करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानामुळे वापरकर्त्याला कोणत्याही प्रकारचा शारीरिक अगर मानसिक धोका निर्माण होऊ नये यासाठी व्यावसायिकांनी प्रयत्न करण्याची आज गरज आहे. त्याचप्रमाणे मानवतेच्या आणि समाजाच्या मूलभूत भावनांना, परंपरांना, संस्कृतीला केवळ नफेखोरीच्या नादाने कलंक लागू नये, हा देखील विचार ठेवणे आणि सजग राहणे गरजेचे आहे.
तंत्रज्ञानाची विविध स्वरूपे आणि त्यांची व्याप्ती पाहता तंत्रज्ञानामध्ये नीतिमत्ता राखणे हे अत्यंत गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा अनैतिक आणि बेकायदेशीर पद्धतीने जर वापर होत असेल तर त्यातून प्रचंड समस्या निर्माण होतात आणि सामाजिक समतोल बिघडतो. कधी कधी त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या या सांस्कृतिक दृष्ट्या आणि सामाजिक मूल्यांच्या दृष्टीने संवेदनशील असतात. माणसाच्या सहज प्रवृत्ती देखील त्याचा पाय घसरवून त्याचा घात करू शकतात आणि तंत्रज्ञान या बाबतीत पूरक ठरू शकते. अशा वेळी तंत्रज्ञान हे एक विष बनते आणि मानवाला अमानवी बनवून सोडते. नीतिमत्ता हा नेहमीच एक प्रमुख वैचारिक विषय राहिलेला आहे आणि तंत्रज्ञानाचा बाबतीतही तो तितकाच खोल आहे. त्यामुळे नीतिमत्ता जपायलाच हवी.
तंत्रज्ञानाचा वापर करताना वापरकर्त्याला याची पूर्ण जाणीव असणे गरजेचे आहे की, तंत्रज्ञान हे माझ्या वापरासाठी तयार करण्यात आलेले आहे त्यामुळे माझ्या समस्या मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडवायच्या आहेत. वापरकर्त्याला तंत्रज्ञान त्याच्या अधीन ठेवता आले पाहिजे आणि वापरकर्ता स्वतः कधीच तंत्रज्ञानाच्या अधीन होऊ नये याची त्याने काळजी घेतली पाहिजे. तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या अनेक समस्या या वापरकर्ता केवळ तंत्रज्ञानाच्या अधीन गेल्यामुळे झालेल्या आहेत. अशा समस्या अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांना देखील निमंत्रित करतात. तंत्रज्ञान हे एक साधन आहे ही गोष्ट आपण नेहमीच लक्षात ठेवायला हवी. कोणतेही तंत्रज्ञान आपण आपले कार्य सुलभ करण्यासाठी वापरत असतो पण जर त्याच्या अधीन झालो तर ते आपल्या डोक्यावर बसते आणि आपल्यालाच नष्ट करून टाकते. आपण उपभोक्तावादी दृष्टिकोन सोडून उदात्त आणि मानवतावादी विचार करणे शिकले पाहिजे. सर्व जग हे माझ्या भोगासाठी आहे हा विचार पूर्णपणे त्यागून प्रत्येक घटकाचे स्वतंत्र अस्तित्व आणि त्याचे सार्वभौमत्व मान्य केले पाहिजे. सर्व नैसर्गिक घटकांवरच तर आपले आयुष्य अवलंबून आहे आणि आपले आयुष्य राहिले, तरच तंत्रज्ञानाचा उद्देश साध्य होईल, अन्यथा सगळेच अनाठायी आहे.
गरज ही शोधाची जननी आहे हे आपण अनेकदा ऐकतो परंतु तंत्रज्ञानाच्या बाबतीत बऱ्याचदा उलटे चित्र दिसून येते. कोणत्याही गोष्टीचा शोध लागला की त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी विविध घटकांची गरज पडू लागते. एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून अनेक क्लिष्ट समस्या निर्माण होत जातात. एखादी मूलभूत समस्या जितकी क्लिष्ट असेल, तिच्या सोडवणुकीतून निर्माण झालेल्या भविष्यकालीन समस्या देखील तितक्याच पटीने क्लिष्ट असतील. ही क्लिष्टता पायऱ्या पायऱ्यांनी वाढत जाईल आणि त्यातून न सोडवता येणाऱ्या समस्यांची साखळी निर्माण होईल. हा एक विरोधाभास आहे आणि या परिस्थितीमध्ये तंत्रज्ञानाचा मूलभूत उद्देशच नष्ट झालेला आहे असे आपल्याला दिसून येते. त्यामुळे कोणत्याही तंत्रज्ञानावरती संशोधन आणि विकास करत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या भविष्यकालीन समस्यांचा आढावा घेऊन त्या कशा प्रकारे टाळता येतील अथवा नैसर्गिकदृष्ट्याच त्या कशा प्रकारे सोडवता येतील याचा देखील विचार होणे गरजेचे असते.
शेवटी आपल्या महत्त्वाकांक्षेचा अतिरेक न करता आपल्याला तंत्रज्ञान वापरायचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. माणसाची महत्त्वाकांक्षा आतापर्यंत त्याच्या प्रगतीलाच कारक ठरलेली आहे ; परंतु ही महत्त्वाकांक्षा त्याला तंत्रज्ञानाच्या गैरवापराला भाग पाडू शकते आणि त्यातून अनेक समस्या त्याच्यासमोर उभ्या ठाकू शकतात. तंत्रज्ञान ही सर्वस्वी आपली निर्मिती आहे आणि आपण ते कोणत्या दृष्टिकोनातून वापरतो ? त्याचा कल्याणासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेतो का ? यावरच आपले भविष्यही अवलंबून आहे. आता तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेले आहे ; त्यामुळे तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर हा आपल्यासाठी जीवघेणाही ठरू शकतो. तो आपल्या प्रगतीला मारक ठरू शकतो त्याचप्रमाणे आतापर्यंत आपण जे मिळवलेले आहे ते सर्व घालवूही शकतो. जेथे स्वातंत्र्य येते तेथे जबाबदारीही येतेच. तंत्रज्ञानाचा विवेकाने आणि सजगतेने वापर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तंत्रज्ञान वापरत असताना त्याचा स्वतःला, समाजाला आणि पर्यावरणाला कसा फायदा होईल ही सार्वत्रिक विकासाची भावना ठेवूनच आपल्याला तंत्रज्ञान वापरायचे आहे. तंत्रज्ञानाच्या साक्षरतेमध्ये सर्व पायऱ्यांवर ही जाणीव ठेवून तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करता येईल.
तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर हा सामाजिक आणि पर्यावरणीय संतुलनाचा मूलमंत्र आहे.
या लेखाविषयी आपल्या सूचना/प्रतिक्रिया संपर्क पृष्ठावरून कळवू शकता. आपल्याला हा लेख आवडला तर शेअर नक्की करा..!